वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या परिसरात जोरदार पाऊस पडला होता. जेजुरी येथील कडेपठार खोर्यामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात असल्याने व यानंतर बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू असून, ओढे, नाले खळाळू लागण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे दौंडज (ता. पुरंदर) येथील स्मशानभूमीलगत नुकतेच नव्याने बांधण्यात आलेला बंधारा ओसंडून वाहू लागल्याने सरपंच सीमा भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांनी गुलाल उधळून ग्रामदैवताचा जयघोष करत खणा-नारळाने ओटी भरत जलपूजन केले.
मुसळधार पावसाने परिसरातील काही ओढे, नाले यामधील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. तर, जलाशय ओसंडून वाहत आहे. वाहणार्या ओढ्यावरील सर्वच बंधारे भरून ओसंडून वाहू लागल्याने या ओढ्यावरील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांच्या शेती सिंचनाचा प्रश्न, परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
भूगर्भाची पाणीपातळी उंचावल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी वाढू लागली आगल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, जलपूजनप्रसंगी उपसरपंच नंदा कदम, ग्रामसेवक डी. बी. शिंदे, सारिका कदम, शोभा कदम, अर्चना दोडके, वसंत येळे, जयवंत जाधव, शंकर दोडके, विशाल भोसले, शरद जाधव, बजरंग फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.