खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: कोंढवे-धावडे पाणीपुरवठा केंद्राचे महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर येथील 27 कर्मचार्यांनीही पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. खडकवासला धरणापासून शिवणेपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी अहोरात्र राबणारे कोंढवे-धावडे पाणीपुरवठा केंद्रातील 27 कर्मचारी वर्षानुवर्षे तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. कोंढवे-धावडेसह उत्तमनगर, शिवणे, कोपरे या गावांचा पालिकेत समावेश करण्यात आला. त्यानंतर गेल्या महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे हे पाणीपुरवठा केंद्र महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी महापालिकेत वर्ग करण्यात आले.
त्या धर्तीवर कोंढवे-धावडे पाणीपुरवठा केंद्रातील कर्मचार्यांना पालिकेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य सरकार, तसेच पालिका प्रशासनाला साकडे घातले आहे. 2012 मध्ये पाणीपुरवठा केंद्र सुरू झाले. केंद्राची क्षमता साठ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची आहे. मात्र, चारपट अधिक लोकसंख्या वाढल्यामुळे कर्मचार्यांना सर्व भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी 24 तास राबावे लागत आहे. पाणीपुरवठा केंद्राचे विद्युत पंप हाऊसपासून थेट पाणीपुरवठा, पाणी करवसुली आदी कामे कर्मचार्यांना करावी लागत आहे.
कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, पगार मात्र तुटपुंजा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोंढवे-धावडे केंद्रातून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी (कर) गोळा करीत होते. मात्र, कर्मचार्यांना दरमहा दहा ते पंधरा हजार असा तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत होते. बहुतांश कर्मचारी स्थानिक कोपरे, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे येथील आहेत. प्रचंड महागाईमुळे घर प्रपंच, गाडीच्या पेट्रोलचा खर्चही भागात नाही, अशी गंभीर स्थिती आहे.