पुणे

आता वीजचोरट्यांवर करडी नजर; महावितरणकडून 3 महिन्यांत 131 कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) कमांडर (सेवानिवृत्त) शिवाजी इंदलकर यांच्यासह सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणार्‍या प्रामाणिक वीजग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणार्‍या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे, त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार, महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-2022 या तीन महिन्यांच्या काळात वीजचोरीची तब्बल 131 कोटी 50 लाखांच्या 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात 63 भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या तिमाहीत वीजचोरीची 239.58 दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल केला आहे.

कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत – 22, पुणे प्रादेशिक कार्यालय – 14, नागपूर प्रादेशिक कार्यालय – 15 तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात – 12 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर – 2021 पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या 20 भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास 20 प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने वीजहानी कमी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. वीजचोरीच्या एकूण अनुमानित रकमेपैकी 2019-20 या आर्थिक वर्षात 54.36 कोटी, 2020-21 या वर्षात 53.18 कोटी तर 2021-22 या वर्षात 124.98 कोटी रुपयांची अनुमानित रकमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली.

'वीज चोरी करू नका'
वीजचोरी करणे, विजेचा गैरवापर करणे किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणे हा भारतीय विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहन विजय सिंघल यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT