कामशेत : पुढारी वृत्तसेवा : येथील मुंबई-पुणे महामार्गावरील पुलावर खड्डे पडल्यामुळे अपघाताची भिती व्यक्त केली जात होती. या संदर्भातील वृत्त 'दैनिक पुढारी' मध्ये प्रसिद्ध होताच पुलावरील रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. हा पुल सहा महिन्यांपासून सुरू झाला असून, या सहा महिन्यांतच पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सध्या या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे भवितव्य धोक्यात आहे. अशी डागडुजी फार काळ टिकणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याबाबत एमएसआरडीसीचे अधिकारी आर. एस. सोनवणे यांनी सांगितले, की पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जात असली तरी ती मजबूत आहे. पावसाळा संपताच पुन्हा नव्याने रस्ता तयार
करण्यात येईल.