अनिल तावरे :
सांगवी : गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या बारामती-फलटण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 27 जानेवारी रोजी फलटण येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले असले, तरी अद्याप काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? असा सवाल सर्वच स्तरांतून उपस्थित होऊ लागला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे शेतकरी व व्यावसायिकांमध्ये संभ—मावस्था निर्माण झाली आहे. या प्रकल्पाची नक्की दिशा ठरविण्यासाठी प्रशासन व बाधितांचा जाहीर मेळावा आयोजित करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात शिरवळ ते बारामती रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, अनेक कारणांमुळे ते काम बंद पडले होते. या रस्त्याचे काम रखडल्याने अनेक वाहनचालकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पुढाकाराने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करून निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
महामार्गाच्या कामाला जेवढा उशीर लागणार तेवढ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे मागील बारा वर्षांच्या अनुभवातून पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष काम चालू होण्यापूर्वी हा प्रकल्प नेमका कसा आहे? या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जमिनी नेमक्या किती जाणार आहेत? व्यावसायिकांच्या विविध समस्या, या रस्त्याच्या कामामुळे होणार्या बेघर नागरिकांना पर्यायी व्यवस्था काय केली? बारामती व फलटण हे दोन्ही तालुके बागायती पट्ट्यात मोडले जातात.
या परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊस वाहतुकीसाठी ठिकठिकाणी अंडरपास किती आहेत. दोन गावांमध्ये ये-जा करण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत. गावागावांमध्ये सेवामार्गाची काय सोय केली आहे? बसथांबे कसे असणार आहेत? निरा नदीवरील पूल कसा असणार आहे? अशा एक ना अनेक समस्यांबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, हे समजण्यासाठी बारामती किंवा फलटण येथे प्रशासन व बाधितांचा जाहीर मेळावा आयोजित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.