पुणे : पुढारी वृतसेवा : विकेंद्रीकरणामुळे गावांचा व शहरांचा विकास होत असल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांना महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी आम्ही केली. गावे महापालिकेत गेल्यानंतर जिजीया कराप्रमाणे कोट्यवधींचा कर महापालिकेने लावला. या नव्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही टुमदार शहर वसवून दाखवू, असा दावा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 'पुढारी'शी बोलताना केला आहे.
महापालिका हद्दीलगतील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिकेतून वगळावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार उरुळी देवाची व फुरसुंगी ही गावे वगळून दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला. यासंदर्भात 'पुढारी'शी बोलताना शिवतारे म्हणाले, महापालिकेमध्ये गावे गेल्यानंतर जिजिया कराप्रमाणे महापालिकेने कर आकारला. गावांमधील पोल्ट्रीचे शेडसुद्धा बुलडोझरने पाडण्यात आले. मुंबईतील बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी कर कमी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आम्ही त्यांना इतर गावातील कर कमी करण्याची विनंती केली आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही विकास करून दाखवू आणि टुमदार शहर निर्माण करून दाखवू. झाली. मात्र, महापालिकेत गावे गेल्यानंतर गावात साधा खिळाही आला नाही, असाही आरोप शिवतारे यांनी केला.
या गावामधील कचरा डेपोच्या संदर्भात आमची भूमिका महापालिकेला सहकार्य करण्याची आहे. गावे वगळली तरी आम्ही शहराच्या कचर्याची अडवणूक करणार नाही. कचरा डेपोची जागा वगळून ती जागा महापालिकेत ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमची मागणी मान्य केल्याने आम्ही आभार मानतो, असेही शिवतारे म्हणाले.