खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडसह पानशेत खोर्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. ओढ्या-नाल्यांतील पाण्याची आवक सुरू झाल्याने पानशेत व वरसगाव धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चार धरणाच्या खडकवासला साखळीत शनिवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता 29.07 टीएमसी म्हणजेच 99.72 टक्के इतका पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत दीड टीएमसी जादा पाणी आहे. गेल्या वर्षी सध्यस्थितीत धरणसाखळीत 28.53 टीएमसी पाणीसाठा होता. दिवसभरात पानशेत येथे 1, तर 2 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेतमधून 683 व वरसगावमधून 570 क्युसेक्स सोडले जात आहे.
पाण्याची भर खडकवासला धरणात पडत असल्याने खडकवासलातील पाण्याची पातळी 98.41 टक्के म्हणजे जवळपास शंभर टक्के झाली आहे. त्यामुळे खडकवासलातून पुन्हा मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. जोरदार पाऊस पडत नसला, तरी धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यात अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे डोंगर कडे,ओढ्या-नाल्यांतून पुन्हा पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत.
खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणातून जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. मुठा कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्यात येणार नाही.
-योगेश भंडलकर,
उपविभागीय अभियंता,
खडकवासला जलसंपदा विभाग