पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी राज्यात शिक्षक भरती केली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे. मात्र, संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षक भरतीप्रक्रिया होणार असून, शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसार शिक्षक भरतीप्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात 30 हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल जाहीर होऊनही प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने भरतीप्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आले आहे.
त्यानुसार शाळांची संचमान्यता 15 मेपर्यंत अंतिम केली जाणार आहे. संचमान्यतेनंतर बिंदुनामावली प्रमाणित करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची नोंद पवित्र संकेतस्थळावर करणे, पहिल्या तिमाहीसाठीच्या जाहिरातींनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे, शिफारस करणे आदी प्रक्रिया 20 ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. यापूर्वीच्या 12 हजार 70 पदांच्या भरतीत विविध कारणांनी रिक्त राहिलेल्या एकूण 1 हजार 500 जागाही आता भरण्यात येणार आहेत. त्या पदभरतीद्वारे एकूण 7 हजार 903 रिक्त पदांवर भरती करण्यात आली असल्याचेदेखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
संचमान्यता 15 मेपर्यंत करण्याचे नियोजन…
यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाद्वारे संचमान्यता करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या जिल्हानिहाय आधारकार्ड कार्यवाहीच्या आकडेवारीनुसार राज्यातील 2 कोटी 13 लाख 85 हजार 302 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 93 हजार 362 विद्यार्थी आधारकार्डविना आहेत. अद्याप 48 लाख 29 हजार 931 विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची वैधतेसंदर्भातील प्रक्रिया अपूर्ण आहे, तर 77.41 टक्के विद्यार्थ्यांची आधारकार्ड वैध ठरली आहेत. त्यामुळे विद्यार्थी वैधतेची कार्यवाही शाळा स्तरावर सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संचमान्यता 15 मेपर्यंत अंतिम करण्याचे नियोजन आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती होणार आहे.