पुणेः आगामी ७२ तास विदर्भाला उष्णलहरींचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.मात्र मान्सून भारतीय किनारपट्टी जवळ येत असल्याने २७ मे नंतर राज्यातील उष्णतेची प्रखर लाट कमी होईल. दरम्यान शनिवारी विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.तसेच आगामी ४८ तास मुंबई आणि पुणे शहराला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून भारतीय किनारपट्टीच्या जवळ येताच बाष्पयुक्त वारे वेगाने राज्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमानात किंचित उतार दिसण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात मात्र आगामी ७२ तास ( २६ मे पर्यंत )उष्णतेची लाट तीव्र राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. २७ मे नंतर राज्याच्या वातावरणात मोठे बदल होतील.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शहराला आगामी ४८ तास मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
शनिवारचे राज्याचे कमाल तापमान
ब्रम्हपुरी ४७.१, अकोला ४४.९, अमरावती ४५.४, चंद्रपूर ४६.२, गोंदिया ४४.९, नागपूर ४५, वाशिम ४३.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४३.८, पुणे ३४.७,लोहगाव ३४.८, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३४.६, मालेगाव ४१.६, नाशिक ३५.५, सांगली ३६.८, सातारा ३६.४, सोलापूर ४०, मुंबई ३४.७, रत्नागिरी ३४.१, डहाणू ३५, धाराशिव ३९.६,छ.संभाजीनगर ४०.७, बीड ४१.२
शनिवारी मान्सूनने अरबी समुद्रा अन बंगालच्या उपसागरात जोरदार प्रगती केली.विदर्भात अजून तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील.महाराष्ट्रात मुंबई,पुणे सह दक्षिण-पश्चिम भागात आगामी ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.विजांचा कडकडाट सुरु असताना झाडाखाली उभे राहू नका.-डॉ.अनुपम कश्यपी,निवृत्त हवामान शास्त्रज्ञ,आयएमडी,पुणे