पुणे : माणुसकीचे विस्मरण झाल्याने आपण सारे यंत्रवत होत आहोत, अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी रविवारी (दि. 25) व्यक्त केली. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते राजदत्त यांना 'ऋग्वेदभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सुरेश धायगुडे आणि कार्याध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मयूरी अत्रे, शिवानी दसक्कर, डॉ. अतींद्र सरवडीकर यांना प्रमिलाबाई देशपांडे स्मृती संगीत पुरस्कार, तर 'देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, गिरगाव', 'अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था' आणि 'श्री शुक्ल यजुःशाखीय माध्यंदिन महाराष्ट्र ब्राह्मण सभा' या संस्थांना सरदार आबासाहेब मुजुमदार स्मृती समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रभुणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
समाजाचे काही देणे लागतो, याचा आपल्याला विसर पडला आहे. मुंबईमध्ये रेल्वे स्थानकावरच्या धावपळीत हजारो लोक एकमेकांसमोरून जात असतात. पण, समोरच्या व्यक्तीला ओळख देण्याइतका वेळही त्यांच्याकडे नसतो. कोणी पडला, तर त्याला हात देण्याची उसंतही नसते, हे दुर्दैवी आहे.
– राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक