पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेताळ टेकडी तोडायची गरज नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे आवश्यक आहे. भविष्यात याच्याच बरोबर पाणी टंचाईपासून वाचायचे असल्यास पुणेकर नागरिकांनीच आवाज उठवणे ही काळाची गरज आहे, असा सूर वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि 'लोकायत' आयोजित 'वेताळ टेकडी वाचवा, पुणे वाचवा' चर्चासत्रात निघाला. या वेळी समितीच्या समन्वयक डॉ. सुषमा दाते म्हणाल्या, 'टेकडी फोडण्याची जी कारणे दिली जात आहेत त्याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येते की, ज्यासाठी टेकडी फोडायची आहे त्यामुळे वाहनांचा फेरा विशेष कमी होणार नाही.
मात्र, पर्यावरणाची हानी जसे की, 1800 झाडे तोडण्यात येतील असे म्हटले जात असताना प्रत्यक्षात 2000 पेक्षा जास्त झाडे प्रकल्पांतर्गत येतील. त्यावरील पशुपक्ष्यांचे जीवन नष्ट होईल. त्यामुळे याला सर्व स्तरातून विरोध होणेच आवश्यक आहे.' सामाजिक कार्यकर्ते रुशल हीना म्हणाले, 'सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डळमळीत करून कार इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री आणि बिल्डर लॉबी यांच्या फायद्यासाठी सर्व धोरणे राबवली जात आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देणे, वाहन फ्री रस्ता करणे, वाहन कर लावणे यातूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे शक्य आहे.' याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नदी सुधार समितीचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर, प्रदीप घुमरे आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते.