पुणे

पुणे शहराचे फुप्फुस असलेली वेताळ टेकडी वाचलीच पाहिजे…

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात आता मोजक्याच टेकड्या उरल्या आहेत. त्यातही वेताळ टेकडी ही शहराचे फुप्फुस आहे. ती जर खोदली तर तेथील जैवविविधताच धोक्यात येईल, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त करीत नागरिकांनी 15 रोजी ही टेकडी वाचविण्यासाठी पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खा. चव्हाण यांनी सांगितले की, यात सर्व नागरिकच एकत्र आले आहेत. मी देखील त्याचा भाग म्हणून सहभागी होत आहे. नदीपात्राची जी अवस्था महापालिकेने केली तशीच अवस्था वेताळ टेकडीची केली जात आहे. तेथील जंगल तोडून तेथून बोगदा व रस्ता नेण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे? ही टेकडी चार किलोमीटर लांबीची असून, येथे आजही अनेक जंगली प्राणी आहेत. त्यांना हुसकाविण्याचाच हा प्रकार आहे. सर्वच पक्षांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकल्पाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका वेगळी आहे. या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, ते या शहरातच नवीन आहेत. त्यांना शहराची माहिती नाही. या प्रकल्पाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पाठिंबा दिला आहे, त्यावर खा. चव्हाण म्हणाल्या की, त्यांना याबाबत मी पुन्हा सविस्तर माहिती दिली. त्यामुळे शहराच्या विकासासाठी त्यांनी देखील आता या प्रकल्पाला विरोध केला आहे. या वेळी समितीचे सुमीता काळे, डॉ. सुषमा दाते आणि हर्षद अभ्यंकर यांनीही पत्रकार परिषदेत मत मांडले.

शनिवारी निघणार पदयात्रा
वेताळ टेकडी बचावसाठी ही पदयात्रा शनिवारी दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकापासून निघणार असून, खांडेकर चौक (जर्मन चौक) येथे समारोप होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT