मंचर : पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर अभयारण्य आणि आहुपे परिसरात पावसाने दडी मारल्याने डिंभे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. रविवारी (दि. 16) धरणात 12.81 टक्के पाणीसाठा होता. डिंभे धरणात गतवर्षी 16 जुलै रोजी 50.66 टक्के पाणीसाठा होता. यंदा केवळ 12.81 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी धरण क्षेत्रात 610 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा अवघा 124 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
कुकडी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. कुकडीतील पाण्यावर आंबेगाव, शिरूर, जुन्नर तसेच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यातील शेती अवलंबून आहे. यावर्षी निम्मा जुलै महिना संपना तरी पाऊस न झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्यांबरोबरच लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेत आहे. धरण परिसरात मोठा पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत तसेच भीमाशंकर अभयारण्य परिसरातदेखील अद्याप मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे डिंभे धरणाच्या साठ्यात पुरेशी वाढ झालेली नाही. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हे ही वाचा :