बावडा: उन्हाळ्याच्या तीव्रतेचा भाजीपाला उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सध्या बाजारामध्ये सर्वच प्रकारच्या भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, सध्या सर्वच भाजीपाल्यांच्या दरांमध्ये मोठी तेजी आल्याचे चित्र इंदापूर तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे.
वाढलेले तापमान व तीव्र ऊन तसेच पाण्याची कमतरता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाकडे पाठ फिरवली. तसेच, ज्यांनी भाजीपाला पीक घेतले आहे, त्यांचेही तीव्र उन्हाळ्यामुळे उत्पादन घटले आहे.
तसेच, दोन महिन्यांपूर्वी आवक वाढून दर घसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाला पीक काढून टाकले. परिणामी सध्या बाजारात सर्वच भाजीपाल्यांची आवक घटलेली आहे. त्यामुळे बहुतेक सर्व भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
हिरवी मिरची, टोमॅटो, गवार या भाजीपाल्यांच्या दराने शंभरी पार केली. याबरोबरच वांगी, भेंडी, कारली, दोडका, कोथिंबीर तसेच इतर पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. मात्र, कांद्याचे दर घसरलेले असून, बटाट्याचे दर फारसे वाढलेले नाहीत.
गेली काही दिवसांपासून मागणीच्या तुलनेत भाजीपाला पुरवठा कमी आहे. भाजीपाला हा किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
आगामी दोन महिन्यात नवीन लागवड केलेला भाजीपाला हा बाजारात येईपर्यंत भाजीपाल्याचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आडत व्यावसायिक दिग्विजय मोरे (बावडा) यांनी व्यक्त केली.