लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र धामणी आणि ग्रामपंचायत शिरदाळे (ता. आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जनावरांवरील लम्पी या घातक आजारावरील लसीकरण शिबिर बुधवारी (दि. 21) शिरदाळे येथे झाले. गावातील सर्व जनावरांचे मोफत लसीकरण या वेळी करण्यात आले.
दरम्यान, लसीकरण झाले असले, तरी शेतकर्यांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश भुरे यांनी सांगितले. या लसीकरणासाठी ग्रामस्थांनी तसेच माजी सरपंच निवृत्ती तांबे व शंकर तांबे यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नेहमी गावकर्यांच्या हिताची कामे करण्यावर भर असतो.त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे. लम्पी आजाराने सगळीकडेच थैमान घातले आहे.
त्यामुळे शेतकर्यांनी देखील खबरदारी म्हणून आपले गोठे स्वच्छ ठेवावेत तसेच जनावरे चरण्यासाठी गेल्यावर जास्त जनावरे एकत्र येणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयूर संभाजी सरडे, सदस्य बिपीन चौधरी, सुप्रिया तांबे, जयश्री तांबे यांनी ग्रामस्थांना केले. या वेळी तब्बल 200 जनावरांचे लसीकरण केल्याचे डॉ. राजेश भुरे यांनी सांगितले. या वेळी माजी सरपंच निवृत्ती तांबे, शंकर तांबे, बाळासाहेब रणपिसे, तात्याभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर तांबे, सोपान मिंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण राज्याला लम्पीचा धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत भाद्रपदी पोळा येऊ घातला आहे. त्याचे मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात आयोजन केले जाते, तसेच या वर्षी चालू झालेल्या बैलगाडा शर्यतीमुळे शेतकर्यांमध्ये बैलांचा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन झाले होते. परंतु,प्रशासनाने या सणावर निर्बंध घातल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर निराशा जरी असली, तरी आजाराची दाहकता लक्षात घेता ते गरजेचे असून, प्रत्येकाने जनावरांची काळजी घ्यावी.
मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे