Manchar Tourist Missing In Uttrakhand Pudhari
पुणे

Gangotri Cloudburst: गंगोत्रीला जातोय, 24 तासांपूर्वीचं स्टेटस... नंतर संपर्कच नाही; पुण्याच्या ‘1990 बॅच’चे 24 जण बेपत्ता

Gangotri Cloudburst Manchar Ambegaon Tourist Missing: शुक्रवारी रात्री हे सर्वजण मुंबईला गेले आणि तिथून विमानाने उत्तराखंडला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

Gangotri Cloudburst Manchar Ambegaon Tourist Missing

तुषार झरेकर

पुणे : उत्तराखंडमधील गंगोत्रीजवळ झालेल्या ढगफुटीनंतर पुण्यातून गेलेल्या 24 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना या प्रकरणात लक्ष घालून मदतकार्य राबवावं अशी विनंती केली आहे.

उत्तराखंडमधील गंगोत्रीला जाताना धराली हे गाव असून हे गाव मंगळवारी ढगफुटीत वाहून गेले. या घटनेनंतर गंगोत्रीला गेलेले पर्यटकही खोळंबले आहेत. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील सन १९९० च्या दहावीच्या बॅचचे हे २४ माजी विद्यार्थी उत्तराखंडला गेले आहेत. शुक्रवारी रात्री हे सर्वजण मुंबईला गेले आणि तिथून विमानाने उत्तराखंडला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

गंगोत्रीतील ढगफुटीपूर्वी मंगळवारी सकाळी समृद्धी जंगम यांनी व्हॉट्सॲपवर "आम्ही गंगोत्रीकडे निघालो आहोत," असा स्टेटस ठेवला होता. जंगम यांचे भावाने ‘पुढारी न्यूज’ला सांगितले की, समृद्धी जंगम माझी सख्खी बहीण आहे. 24 तासांपेक्षा जास्त काळ झाला, त्यांच्याशी संपर्क होत नाही. आम्ही आणि ग्रुपमधील इतर सदस्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यासंदर्भात X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी धराली गावात सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल माहिती दिली. बुधवारी संध्याकाळी पाचपर्यंत 190 जणांची सुटका करण्यात आली असून केंद्र आणि राज्य सरकारचे पथक युद्धपातळीवर मोहीम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. ठिकठिकाणी चिखल आणि मातीचे ढिगारे असून ढगफुटीमुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाल्याचंही ते म्हणाले. जखमींवर उत्तर काशीमधील रुग्णालयात उपचार सुरू असून धरालीला जोडणाऱ्या रस्त्यांनाही ढगफुटीचा फटका बसला असून खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तराखंड ढगफुटीत (ऑगस्ट) 2025 अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाईन क्रमांक काय आहे?

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT