पुणे

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान; घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले, भाजीपाला, फळबागांना फटका

Laxman Dhenge

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून खेड तालुक्यात सुरू असलेला आवकाळी पाऊस व वादळ वार्‍यात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरांचे, गुरांच्या गोठ्यांचे पत्रे, कौले वार्‍याने उडून गेली. तर काढणीला आलेली उन्हाळी बाजरी, जनावरांच्या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळ वार्‍याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यात खेड, आंबेगाव भागातील काढणीला आलेली उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली, तर अनेक भागात जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. यासोबतच भाजीपाला पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला. तर आंबा, जांभूळ या फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तर प्रचंड पावसासोबत वादळी वारेदेखील वाहिले. त्यामुळे अनेकांच्या घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळन पडली. शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात प्रचंड वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले असून, झाडे पडल्याने घरांच्या भिंती देखील पडल्या आहेत. यापूर्वी शेतकर्‍यांना चक्रीवादळात शासनाने ज्या पध्दतीने मदत केली, त्याप्रमाणेच आता देखील अवकाळी पावसाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तातडीने मदत द्यावी.

– दत्ता सुतार, उपसरपंच, आंबोली, ता. खेड

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT