पुणे : पुढारी वृत्तसेवा
यंदा मान्सून राज्यातून दरवर्षीच्या तुलनेत लवकर माघारी परतणार आहे. मात्र त्यापाठोपाठ अवकाळी पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम थेट डिसेंबरपर्यंत राहणार असून ११५ टक्के बरसण्याचा अंदाज आहे.
हा अवकाळी पाऊस ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याचे कारण ला-निना तटस्थ अवस्थेतून सक्रिय अवस्थेकडे जात आहे. दरवर्षी मान्सून राज्यातून साधारणपणे ५ किंवा ६ ऑक्टोबरला निघतो.
तो १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत बरसून मग पुढे दक्षिण भारतात जातो. त्यानंतर पावसाचा मोठा खंड असतो. नोव्हेंबरमध्ये दिवाळीत बहुतांशवेळा हलक्या सरी पडतात. मात्र, हा पाऊस साधारण ३० ते ५० मि.मी. इतका असतो. यंदा मान्सून परतल्यावर लगेच अवकाळी पाऊस सुरू होत आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर ११५ टक्के पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून राज्यातून दक्षिण भारतात जाण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे जाईल, असा अंदाज आहे.
त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर अवकाळी पावसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही कमी दाबाचे पट्टे तयार होऊन अधूनमधून अवकाळी पाऊस पडेल. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सुनोत्तर (अवकाळी) पावसाचे प्रमाण ११५ टक्के राहणार आहे.
गेल्या २४ तासांत मान्सून राजस्थानातील बहुतांश भागासह जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह महाराष्ट्राच्या काही भागांतून परतण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी ४८ ते ७२ तासांत राज्यात परतीचा मान्सून बरसण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.