पुणे; पुढारी वृत्तसेवा: खासगी महाविद्यालयांमध्ये बेकायदा पद्धतीने व्यवस्थापन कोट्यात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नाही, असे स्पष्ट निर्देश प्राधिकरणाचे सचिव आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांना दिले आहेत. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्किटेक्चर आणि विधी अशा व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच नामांकित खासगी महाविद्यालये त्यांच्या व्यवस्थापन कोट्यातील (मॅनेजमेंट कोटा) जागा भरत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेर्या झाल्यानंतर आणि गुणवत्ता याद्या तयार करून खासगी महाविद्यालयातील जागा भरल्या जाव्यात, असा नियम असतानाही त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे तक्रार दाखल केली होती.
नियमानुसार व्यवस्थापन कोट्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना डीटीईमार्फत सर्व खासगी महाविद्यालयांना देण्यात याव्यात. नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात येणार नाही, असे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश भविष्यात रद्द होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यादव यांनी त्यांच्या तक्रारीत पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बेकायदा पद्धतीने व्यवस्थापन कोट्यातील जागा भरल्याचे नमूद केले होते. या सर्व महाविद्यालयांकडून खुलासा प्राप्त करून तो सीईटी सेलकडे सादर करावा, असे सीईटी सेलच्या वतीने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांची फसवणूक होत असल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्यास आमच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.