इंदापूर: भीमा नदीच्या खोऱ्यातील सर्वांत मोठे आणि सोलापूर, पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असले उजनी धरण रविवारी (दि. १२) दुपारी ४ वाजता ५० टक्क्यांवर पोहोचले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणातील उपयुक्त पाणी साठा ५०.०८ टक्के झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४९४.३२० मीटर असून, उपयुक्त साठा ७५९.८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २६.८३ टीएमसी झाला आहे. धरणाचा एकूण साठा २५६२.६२ दशलक्ष घनमीटर अर्थात ९०.४९ टीएमसी आहे.
शनिवारी (दि. ११) रात्री ९ वाजेपर्यंत हा साठा ४९.०२ टक्के होता. म्हणजे अवघ्या २४ तासांत १.०६ टक्क्यांनी वाढ होऊन धरणाने अर्धशतक गाठले आहे. सध्या दौंड येथे भीमा नदीतून ६ हजार ७८० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच ७५ टक्के आणि नंतर १०० टक्के भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उजनीचा साठा ५० टक्क्यांवर गेल्याने इंदापूर, बारामती, दौंड, माढा आणि करमाळा या पाच तालुक्यांतील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा धरण लवकर भरल्याने ऊस, ज्वारी, बाजरी आणि भाजीपाला पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता शासनाकडून पाण्याचे काटे कोर नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
मायनसमधून प्लसमध्ये प्रवास
गेल्या महिन्यात उजनी धरण मृतसाठ्यावर आले होते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मंगळवारी (दि. ७) रात्री दीड वाजता धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्याच्या वर गेला आणि धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. बुधवारी (दि. ८) सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा फक्त १७.२५ टक्के म्हणजेच २६१.७ दशलक्ष घनमीटर/९.२४ टीएमसी इतका होता. त्या वेळी धरणाची पाणीपातळी ४९२.२८० मीटर असून, एकूण पाणीसाठा २०६४.५८ दशलक्ष घनमीटर/७२.८० टीएमसी होता. केवळ ४ दिवसांत उपयुक्त साठ्यात ३२.८३ टक्क्यांची वाढ झाली.