पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. काल बुधवार दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. मयूर भारसाके आणि तुषार अहिरे हे दोघे काही मित्रांच्या सोबतीने पवना\धरण परिसरात फिरायला गेले होते.
यावेळी पवना धरणाच्या पाण्यात मित्र पोहोण्यास उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मयूर भारसाके आणि तुषार आहेर हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. आपले मित्र डोळ्यादेखत पाण्यात बुडत असताना मित्रांनी आरडाओरड केल्यावर स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या दोघांचा पवना धरणाच्या पाण्यात शोध घेतला.
रात्री उशिरा मयूर याचा मृतदेह शोध पथकाला सापडला असून तुषार अहिरे याचा शोध अजूनही सुरूच आहे. हे दोन पर्यटक पुण्याच्या बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते. याच कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, याआधीही पाण्याचा अंदाज न आल्याने काही पर्यटकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.