पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत जनमत, सर्व्हे भाजपविरोधात जात असल्याने भाजपवर केंद्रातील नेते प्रचाराला बोलावण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. तसेच शिवसेना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी काम करणार असल्याने आपला विजय निश्चित आहे. कसबा पेठ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये गुप्ते मंगल कार्यालयात शिवसेना पदाधिकार्यांची बैठक झाली, या वेळी ते बोलत होते.
रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, गजानन पंडित, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, राम थरकुडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अहिर म्हणाले, 'ही निवडणूक महाविकास आघाडी या नात्याने आपल्याला जिंकायची आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता कसबा मतदारसंघात बदल शक्य आहे. ही निवडणूक अटीतटीची असून, आपल्याला प्रत्येक बूथमध्ये काम करून विजय निश्चित करायचा आहे.'