पुणे

महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण केल्यास होणार ‘ही’ कारवाई

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वीजग्राहकांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे थकीत वीजबिलांची वसुली मोहीम राबवित आहेत. यात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या सरकारी कामात कर्मचार्‍यांना शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार होत असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई तत्काळ करण्यात येणार आहे.

गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचार्‍यांना मारहाण व धक्काबुक्की करण्याचे पुणे व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी 6 आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण 13 प्रकार घडले आहेत. या प्रकरणातील 19 आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तसेच आरोपींच्या अटकेचीदेखील कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच, विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा वेळेत भरणा न करणार्‍या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत.

मात्र, ती अव्हेरून शिवीगाळ व मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचार्‍यांना शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणां मधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरा वरून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे.

महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीजबिल नियमित भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकते नुसार स्थानिक पोलिस विभागाचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केली आहे. तसेच, व्यवस्थापनसंबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही नुकत्याच झालेल्या आढावा बैठकींमधून नाळे यांनी दिली. वीजग्राहकांनीदेखील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

सरकारी कामात अडथळा आणणे (कलम 353), कर्मचार्‍यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे (कलम 504), धमकी देणे (कलम 506), मारहाण करणे (कलम 332 व 333), कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे (कलम 427), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे (कलम 143, 148 व 150), अनधिकृत जमाव गोळा करणे (कलम 141 व 143) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमान्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमान्वये दोन ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT