कार्यकर्त्यांमुळे पदे मिळाल्याचा त्यांना विसर; शरद पवारांची अजित पवारांवर टीका File Photo
पुणे

Political News: कार्यकर्त्यांमुळे पदे मिळाल्याचा त्यांना विसर; शरद पवारांची अजित पवारांवर टीका

पुढारी वृत्तसेवा

Sharad Pawar: सामान्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपण त्यांना पदे दिली. कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून ते मंत्री झाले. पण त्याची आठवण आपल्या सहकार्‍यांना राहिली नाही, या शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता पक्ष सोडून गेलेल्यांना टोला लगावला.

दिवाळी पाडव्याच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी(दि. 1) पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शुक्रवारी त्यांनी पक्षफुटीवर भाष्य करत सत्तेत जाणार्‍यांना चिमटे काढले. या वेळी शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार व कार्यकर्ते पवारांच्या भेटीसाठी आले होते. या शिवाय राज्याच्या अन्य भागातूनही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेने गतवेळी आपल्याला 54 जागा दिल्या. परंतु, सत्तेचा गैरवापर करत हे सरकार स्थापन झाले. एक काळ असा होता की विकासात महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. आज तो सहाव्या स्थानी गेला. ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांना सत्तेची जाण नाही. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, त्यामुळे शिरूरमध्ये अशोक पवार निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

साखर कारखानदारी आपण उभी केली, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे महाराष्ट्र साखर धंद्यातील महत्त्वाचे राज्य झाले. राज्यात सत्तांतर होणार आहे. सत्ता आल्यानंतर शिरूरचा घोडगंगा साखर कारखाना कसा सुरू होत नाही ते मी बघतो, असेही शरद पवार म्हणाले.

सध्याच्या नेत्यांची भूमिका जो विरोधात आहे, त्याला अडचणीत आणणे अशी असल्याची टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. तुतारी चिन्हाऐवजी ट्रम्पेट असाच उल्लेख होणार असल्याने आता आपल्याला फटका बसणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT