पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवीन नाटकांची रंगभूमीवर पडलेली भर…नाट्यप्रयोगांची वाढलेली संख्या….शनिवारी-रविवारी नाटकांना मिळणारा तुफान प्रतिसाद अन् खासगी नाट्यगृहांमध्ये रंगणार्या प्रयोगांना मिळणारा चांगला प्रतिसाद…यामुळे सध्या व्यावसायिक नाटकांची गाडी सुसाट आहे. कोरोनामुळे दोन वर्षे आर्थिक झळ करणार्या व्यावसायिक नाटकांची आर्थिक गाडीही रुळावर आली असून, प्रयोगांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही पूर्ववत होत आहे. यामुळे नाट्य संस्था आणि निर्माते- दिग्दर्शकांनी नवीन व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणले असून, त्याला चांगला प्रतिसाद आहे.
नव्या वर्षातही अनेक नवीन नाटकांची भर मराठी रंगभूमीवर पडणार आहे. त्यासाठी नाट्यसंस्था-निर्माते-दिग्दर्शकांचे नियोजन पूर्ण झाले आहे. मार्चनंतर आणखी नवीन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे मराठी रंगभूमीला मोठा फटका बसला. परंतु, आता नाट्यप्रयोगांची संख्या वाढल्याने आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रंगभूमीवर अनेक नवीन नाटकांची भर पडली आहे.
त्यात बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह या नाट्यगृहांमध्ये नाट्य प्रयोगांसाठीच्या तारखांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले असून, नवीन वर्षातही प्रेक्षकांना विविध नाटकांचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. याविषयी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय शिंदे म्हणाले, 'सध्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार्या नाट्यप्रयोगांना चांगला प्रतिसाद आहे.
नाटकांचे बुकिंगही चांगले होत असून, शनिवार आणि रविवारचे प्रयोग तर हाऊसफुल्ल होत आहेत. आम्ही खासकरून व्यावसायिक नाट्य प्रयोगांसाठी शनिवार आणि रविवारच्या तारखा दिल्या असून, सोमवार ते शुक्रवार या काळात होणार्या प्रयोगांनाही बर्यापैकी प्रतिसाद आहे. नवीन वर्षात व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे बुकिंग सर्वाधिक आहे.'
निर्मात्या-दिग्दर्शिका भाग्यश्री देसाई म्हणाल्या, 'व्यावसायिक रंगभूमीवर नेहमीच्या नाटकांच्या प्रयोगांसह नवीन नाटकांची भर पडली आहे. अनेक निर्माते आणि नाट्य संस्थांनी त्यांची नवीन नाटके रंगभूमीवर आणली असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या घडीला प्रयोगांची संख्याही वाढली आहे, तर शनिवारी आणि रविवारी होणार्या प्रयोगांना प्रतिसादही चांगला आहे. पण, सध्या नाट्यप्रयोग होत असल्याने आणि प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळला असल्याने आनंद आहे. रंगभूमीवर अनेक चांगली नाटके येत आहेत.'