पुणे

पुणे : दुग्ध व्यवसायाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : दुधाला चांगला बाजारभाव मिळू लागल्याने शेतीला पूरकधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाकडे पुन्हा शेतकरी वळू लागले आहेत. दूध देणार्‍या जनावरांची संख्या आता वाढत चालली आहे. या जनावरांसाठी मुरघास अतिशय फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात घरीच मुरघास तयार करून तो साठवून ठेवत आहेत. मध्यंतरी दुधाचे बाजारभाव घसरले होते. उत्पादन खर्चात मोठी वाढ तसेच पशुखाद्यांचे वाढलेल्या बाजारभावामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला होता; परंतु गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक तरुण शेतकरी दुधाचा व्यवसाय करू लागले आहेत. अनेकांनी आधुनिक गोठे उभारून त्यामध्ये नवीन आधुनिक तंत्रांचादेखील वापर केल्याचे दिसत आहे. तसेच परराज्यातून अधिक दूध देणार्‍या संकरित गायी आणत आहेत. तसेच चाराटंचाईवर मात करण्यासाठी मुरघासनिर्मितीदेखील सुरू केली आहे.

हिरवा चारा पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देण्यासाठी किमान 45 दिवस चारा हवाबंद करून शेतकरी मुरघास तयार करत आहेत. मुरघासासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके घेतली जात आहेत. यामध्ये मका पिकाचा सर्वांत जास्त वापर केला जात आहे. मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो. थोरांदळे गावातील अनेक शेतकर्‍यांनी घरीच मुरघासाची निर्मिती केली आहे.

अल्पभूधारक असणारा शेतकरीदेखील मुरघासाची निर्मिती केल्यानंतर गाईंचा सांभाळ करू शकतो. मुरघासामुळे हिरव्या चार्‍याची गुणवत्ता सुधारते. खुराकामध्ये काही प्रमाणात बचत होते. जनावरे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

उन्हाळ्यात ठरतो फायदेशीर
मुरघास तयार केल्यानंतर वर्षभराच्या हिरव्या चार्‍याचे नियोजन करता येते. उन्हाळ्यातही मुरघास जनावरांना फायदेशीर ठरतो. तसेच मुरघासामुळे दररोज शेतात जाऊन जनावरांसाठी चारा, वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात. वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होतात.

SCROLL FOR NEXT