न्हावरे; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसराला शनिवारी सायंकाळी जोरदार वार्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये शेतातील ऊस तसेच कांदा रोपवाटिका भुईसपाट झाली आहे. एकीकडे शेती पिकांना बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाचा कहर यामुळे शेतकरीवर्ग आता आर्थिक संकटात सापडला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून न्हावरे परिसरात दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. सध्या शेतातील बाजरीचे पीक काढणीला आले आहे, मात्र सततच्या पावसामुळे त्याचे नुकसान होऊ लागले आहे. शनिवारी सायंकाळी जोरदार वार्यासह पाऊस पडल्याने खरीप हंगामातील बाजरीने शेतात लोळण घेतली तर पूर्ण वाढ झालेल्या शेतकरी अनिल कोरेकर यांच्या शेतातील सर्वच ऊस जमिनीलगत आडवा झाला आहे.
कोरेकर तसेच या परिसरातील अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या शेतातील रोपवाटिका ही भुईसपाट झाल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. सततच्या पावसामुळे आता शेतातील उरलेसुरले पीक ही जाते की काय? यामुळे यापरिसरातील सर्वच शेतकरीवर्ग खूपच चिंताग्रस्त झाला आहे.