पुणे ः फिर्यादी तरुणीचे आधीच लग्न झाले असल्याने त्याच्यासोबत लग्न करणे शक्य नाही, हे तिला माहित होते. त्यामुळे लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही. तिच्या घरात आणि आरोपीच्या घरात जबरदस्तीने आरोपीने अत्याचार केले म्हणण्यास वाव नसल्याचे नमूद करत बलात्कार प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी छायाचित्रकार तरुणाला खटल्यातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
रोहीत (वय 21) असे खटल्यातून वगळण्यातून आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणात एका 26 वर्षांच्या तरुणीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तरुणीही विवाहित असून तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. डिसेंबर 2021 मध्ये तरुणी रोहीत याच्याकडे फोटो काढण्यासाठी गेली असता दोघांची ओळख झाली. या ओळखीतून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. त्याने तिच्यावर तिच्या व त्याच्या घरी बर्याच वेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
मात्र झालेल्या आरोपांमुळे तरूणाच्या वतीने अॅड. विभीषण गदादे यांनी त्याला खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी गुन्हा खोटा, बनावट व निराधार असल्याचा युक्तीवाद केला होता. तसेच व्हॉट्सअॅप चॅटवरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले होते. प्रथमदर्शनी तरुणाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचे पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तिवाद अॅड. गदादे यांनी केला. त्यावर न्यायालयाने दाखल पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाहीत, त्यामुळे आरोपीविरूध्द खटला चालवणे व्यर्थ ठरेल, आरोपीला पुढे या प्रकरणातून वगळले जाईल, असा निर्वाळा देत या खटल्यातून तरुणाला मुक्त केले.
महिलांवरील बलात्काराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून अशा प्रकरणात तात्काळ दखल घेतली जाते. मात्र कायद्याचा गैरवापर करून बलात्काराच्या खोट्या तक्रारींचे प्रमाण देखील वाढत आहे. प्रेमसंबंध बिघडल्यानंतर कालांतराने खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. त्यामुळे तरूणांना कोर्ट कचेरी तुरूंग असा प्रवास सहन करावा लागतो. अशा खोट्या तक्रारींमधून बाहेर पडण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागते. ते आर्थिकदृष्ट्या पडवरणारे नसते. अशा परिस्थितीत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला बलात्काराच्या खटल्यात तरूणाला वगळण्याचा महत्त्वपूर्ण निकाल धाडसी आणि दुर्मिळ समजला जात आहे. त्यामुळे बलात्काराच्या खोट्या तक्रारींना काही अंशी आळा बसण्यास मदत होईल.अॅड. विभीषण गदादे, तरूणाचे वकील