मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : केशवनगर येथील नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधीही पसरली आहे. याचा रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महापालिका प्रशसनाने नदीपात्रातील जलपर्णी त्वरित काढावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुळा-मुठा नदीपात्रात पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिने मैलापाणी वाहत असते. हे मैलापाणी केशवनगर येथील जॅकवेल प्रकल्पाच्या ठिकाणी अडविले जात असल्याने त्याची दुर्गंधी येत असते. त्यातच या पाण्यावर जलपर्णी वाढल्याने नागरिकांनी दुहेरी त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. याविषयी महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
नदीपात्रामध्ये साचलेल्या मैलापाण्याची दुर्गंधी तसेच त्यावर जलपर्णी वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
– देवेंद्र भाट, माजी शाखाप्रमुख, केशवनगर-मुंढवा, शिवसेना (ठाकरे गट)
हेही वाचा