विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात दहाही विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढती होणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर -हवेली, शिरूर-हवेली, आंबेगाव-शिरूर, जुन्नर, खेड-आळंदी, भोर-वेल्हा-मुळशी, मावळ या मतदारसंघांचा यात समावेश आहे.
अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने या एकाही मतदारसंघातील उमेदवार अधिकृत जाहीर केलेला नसला तरी अनेक जण निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या जोरदार हालचाली यापूर्वीच सुरू झाल्या आहेत, आता या हालचालींचा वेग वाढणार आहे. पुणे जिल्हा राज्याच्या राजकारणातील मातब्बर अशा पवार घराण्याचा असल्याने आणि त्या घराण्यातच फूट पडल्याने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर लोकसभेनंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सामना रंगणार आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी त्याला निवडूण आणण्याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांवर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आले असल्याने सामना मोठा तुल्यबळ होणार आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्यता असल्याने येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी फार काळजी दोन्ही बाजूच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. बंडखोरांना रोखण्याचे आव्हान दोघांसमोर असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती किंवा शिरूर-हवेली) मंत्री दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव-शिरूर), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूर), माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (पुरंदर-हवेली) यांच्या लढतींकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तसेच बारामतीत अजित पवार उभे राहो न राहो बारामतीच्या लढतीकडे तर देशातील राजकीय नेत्यांचे लक्ष असणार आहे.
या वेळचे निवडणूकपूर्व चित्र अतिशय भयावह आहे, निवडूण येण्यासाठी काहीही करण्याची प्रमुख उमेदवारांची तयारी दिसत असल्याने पैसा पाण्यासारखा वाहणार असे चित्र आहे. त्यात ऐन दिवाळीत प्रचार असल्याने या वेळी मतदारराजाची दिवाळी जोरात होणार, हे मात्र निश्चित झाले आहे. याबरोबरच गुंडापुंडांचा वावर आणि वापर या वेळच्या निवडणुकीत वारेमाप होण्याची शक्यता असल्याने तसेच आरक्षणाचा विषय अतिशय टोकदार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहू शकतो.