माणिक पवार :
नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : नसरापूरमध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून असलेल्या जीर्ण झालेल्या वाड्यात अंगणवाडीपासून विविध शासकीय कार्यालयांचा जीव मुठीत घेऊन कारभार हाकला जात आहे. इमारतीला जागोजागी भेगा पडल्या असून, वाडाचा काही भाग पूर्णतः बंद अवस्थेत आहे. नैसर्गिक घटना घडल्यास इमारत (वाडा) कधी कोसळेल याचा भरवसा नाही. नसरापूर (ता. भोर) येथे पंतसंचिवांनी सुमारे 73 वर्षांपूर्वी बांधलेल्या या भव्य इमारतीची अवस्था सध्या जीर्ण झाली आहे. इमारतीची मालकी नसरापूर ग्रामपंचायतकडे असून, याच इमारतीमध्ये तळमजल्यात राजगड पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर वरच्या मजल्यावर अंगणवाडी, नसरापूर मंडलाधिकारी कार्यालय व पीएमआरडीएची कार्यालय आहेत. कामानिमित्त रोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असते. जीर्ण झालेला हा वाडा कमकुवत व धोकादायक असल्याने भविष्यात दुर्घटना घडून मोठी जीवितहानी शक्यता नाकारता येत नाही.
या वाड्यात दक्षिण बाजूला पोलिस चौकी, सरकारी दवाखाना, बालवाडी, वाचनालय, सर्कल व ग्रामपंचायत कार्यालय तसेच पश्चिमेला परिचारिकासाठी दोन खासगी निवास, उत्तरेला वैद्यकीय निवास, सामाजिक वनीकरण व सार्वजनिक बांधकाम कार्यालय होते. यापैकी सध्या पोलिस, दवाखाना, अंगणवाडी, महसूलचे कार्यरत असून, उर्वरित संपूर्ण वाडा धूळखात बंद अवस्थेत आहे. याच वाड्यात पूर्वी
होते कारागृह 'राजगड' तालुका कार्यालय म्हणून पूर्वी याच वाड्यातून भोर व वेल्हा या दोन तालुक्यांचा कारभार चालत असे. या वाड्यात त्याकाळी न्यायालय व कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृह होते. शेती तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठासह इतर कार्यालय याच वाड्यात होते.