पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेस विचारधारा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज मात्र देशात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम 'भारत जोडो' पदयात्रेतून करीत आहेत,' असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18 व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पवार, सप्ताहाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, की इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणार्यांचे इथे उदात्तीकरण होणे, दुर्दैवी आहे.
इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणार्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा,' असेही आव्हाड म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन जोशी यांनी केले. अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर, वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.
राज ठाकरे जातीद्वेष पसरवताहेत
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मांत द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. त्यांची विचारधारा समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची आहे. जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार केले आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून असो, असे आरोप आव्हाड यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केला.