ओतूर: उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळ्याची चाहूल लागली असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. ओतूर वन विभागांतर्गत जंगलातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटत चालले असल्यामुळे वनक्षेत्रात निर्मिती केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ व वनपाल सारिका बुट्टे यांनी दिली आहे.
अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ओतूर वनक्षेत्रात बिबट हरीण, सांबर, तरस, वानर, रानडुकरे, ससे, मोर, लांडोर, तसेच विविध जातीचे पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्य:स्थितीत जंगलातील ओढे, नाले, तसेच नैसर्गिक पाणवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे अनेक वन्यजीवांनी जंगलातील आपला मुक्काम हलविताना मानवी वस्त्यांचा आधार घेतल्याचा अनुभव आहे. स्थलांतरित होत असताना हेच वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधात महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत अपघातात मृत्यू पावतात. अशा अपघाती घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठवून वन्य प्राण्यांची विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.
ओतूर वनहद्दीत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी वन विभागाने विशेष काळजी घेत खामुंडी, अहिनवेवाडी येथे कृत्रिम पाणवठे सज्ज ठेवले आहेत. येत्या काही दिवसात या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पुरेसे पाणी भरले जाणार असून प्रत्येक पाणवठ्यावर देखरेख करण्यासाठी वनकर्मचारी नेमणुकीस असणार असल्याचे वन विभागाने सांगितले.