पुणे

वाल्हे : वाढत्या उष्णतेमुळे गव्हावर तांबेरा; शेतकरी चिंतेत

अमृता चौगुले

वाल्हे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वाल्हे परिसरातील तापमानात वाढ होत असून, त्याचा गव्हाच्या पिकांवर दुष्परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे गव्हाच्या ओंब्यांतून दाणे खाली पडू लागले असून तांबेराचाही (बुरशी) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

वाल्हे परिसरात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी केली. एकूण 74 हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. उगवणीच्या काळात चांगली थंडी व पोषक वातावरण असल्याने गव्हाची जोमाने वाढ झाली. सध्या पीक अंतिम टप्प्यात आले आहे.
मात्र मागील काही दिवसांपासून कमी-जास्त होणारी थंडी आणि अचानक वाढणारी उष्णता यामुळे गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी गव्हाची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. तर अनेक शेतकर्‍यांच्या गव्हाच्या ओंबीतून दाणे निखळून पडू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिकांवर महागडी औषध फवारली केली जात आहे; पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. खरिपाची कसर रब्बीत भरून काढण्याची अपेक्षा होती. मात्र, बदलत्या वातावरणामुळे गव्हाचे उत्पादन कमी होणार असल्याच्या चिंतेने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. मागील वर्षीदेखील उष्णतेच्या लाटेमुळे येथील गव्हाच्या उत्पादनात मोठी घट
झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT