पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यात शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेल्या ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षेत गैरप्रकार करून टीईटी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्या शिक्षकांच्या मान्यता आणि त्यांचा शालार्थ आयडी रद्द करण्याची कारवाई राज्यातील सर्व विभागीय उपसंचालकांनी करावी, असे स्पष्ट आदेश प्राथमिकचे संचालक महेश पालकर यांनी दिले आहेत. पालकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र शिक्षक परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आली होती.
संबंधित परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांबाबत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागीय उपसंचालकांनी नियमानुसार सुनावणी घेऊन संबंधित कर्मचार्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करावी आणि त्यानंतर शालार्थ आयडीदेखील रद्द करावा. संबंधित कारवाई 60 दिवसांत पूर्ण करण्याची खबरदारी संबंधित विभागीय उपसंचालकांनी घ्यावी.
संबंधित विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या मुदतीत तत्काळ कार्यवाही होणे अपेक्षित असतानाही याबाबत केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल अद्याप देण्यात आलेला नाही. तरी संबंधित प्रकरणी तातडीने कार्यवाही करून अंतिम अहवाल संचालनालयास सादर करावा. अन्यथा या कार्यवाहीस आपल्या स्तरावरून दिरंगाई झाल्यामुळे होणार्या परिणामांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराच पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना दिला आहे.