पुणे: स्वारगेट परिसरातील पीएमपीच्या अपुऱ्या संख्येमुळे बसथांब्यावर प्रवाशांचे हाल संपण्याचे नाव घेत नाहीत. वाढत्या उन्हामुळे प्रवाशांची अक्षरशः काहिली होत असून, थांब्याच्या डोक्यावर छप्पर नसल्याने लहान मुले, महिला आणि वृद्धांना उघड्यावर बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. ‘प्रवासी उन्हात आणि प्रशासन जोमात’ असे चित्र सध्या स्वारगेट परिसरात पाहायला मिळत आहे.
सध्या ऊन वाढत आहे. सावलीसाठी साधा आडोसाही उपलब्ध नसल्याने प्रवाशांना घामाघूम व्हावे लागते. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पायाभूत सुविधांचा अभाव
स्वारगेटहून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, येथे बसथांब्यावर पर्त्यांचे शेड प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहेत. त्यामुळे बस येण्यास उशीर झाल्यास प्रवाशांना भरउन्हात उभे राहावे लागत आहे.
स्वारगेट बसथांब्यावर उभे राहणे म्हणजे अग्नीदिव्यच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून हीच परिस्थिती आहे. उन्हाचे चटके सहन करत तासन्तास बसची वाट पाहावी लागते. साधे पिण्याचे पाणी किंवा बसण्यासाठी सावलीची सोय नसेल तर आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा? अधिकारी यांनी स्वतः एकदा भरदुपारी इथे येऊन प्रवाशांचे हाल पाहावेत, म्हणजे त्यांना आमचा त्रास समजेल.सौरभ बारटक्के, प्रवासी