पुणे: लहान मुली आणि महिलांवर रोज अत्याचार होत असताना राज्य सरकार राजकारण करत आहे. महिला आणि बालविकास विभाग तसेच या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे आहेत तरी कुठे ? महिला आयोगाचे अध्यक्षपदही रिक्त असून, महिलांनी दाद कुठे मागायची, असा सवाल शिवसेना (उबाठा) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (दि.7) पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्वरित कोणाची तरी नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बालगंधर्व कलादालनात गुरुवारी (दि.7) आयोजित एका कार्यक्रमानंतर अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदिती तटकरे यांनी महिला आणि बालविकासमंत्री म्हणून काय केले, हे त्यांनी सांगावे. त्यांनी आता ज्या घटना घडत आहेत, त्यासंदर्भात एकही बैठक घेतलेली नाही. झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे अंधारे म्हणाल्या.
नसरापूर घटनेवर अंधारे म्हणाल्या, महिला-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमधील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळतो तरी कसा? ही गोष्ट का घडते आहे, याचा सरकारने विचार केला पाहिजे.