पुणे : शनिवारी राज्यात जणू उष्णलहरींचा आगडोंब शिगेला पोहोचला होता. विदर्भात 44 ते 45 अंश, तर उर्वरित भागात सरासरी 41 ते 43 अंशांवर पारा गेल्याने अंगाची लाही लाही करणारा उकाडा होता. अकोला येथे 45 अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मे महिन्याची सुरुवात पावसाने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
एप्रिलमध्ये राज्यातील विदर्भ, कोकण वगळता उर्वरित भागात चांगला पाऊस झाला आहे, तसाच पाऊस मे महिन्यात होईल, असा अंदाज आहे. राज्यात 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत पुन्हा पाऊस सुरू होणार आहे. राज्यात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मात्र, दिवसभर अवघा प्रदेश उष्णतेने होरपळून निघाला.
सर्वच भागांतील कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने असह्य उकाड्याने नागरिक अस्वस्थ झालेले दिसत होते. विदर्भाचा पारा 44 ते 45 तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा पारा 40 ते 42 अंशांवर गेला होता; तर कोकणात दमट वातावरण होते. एकूणच शनिवारी अवघे राज्य उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाले.
अकोला 45, अमरावती 44.8, वर्धा 44.4, चंद्रपूर, यवतमाळ 44, नागपूर 43.4, गोंदिया, 43.2, नागपूर 43.4, ब्रह्मपुरी 43.7, पुणे 42, कोल्हापूर 37.2, मुंबई 33, रत्नागिरी 36.3, जळगाव 43.3, महाबळेश्वर 32.6, मालेगाव 42.6, नाशिक 39.6, सांगली 39.8, सातारा 38.9, सोलापूर 41.4, धाराशिव 40.4, छ. संभाजीनगर 41.4, परभणी 42, बीड 41.5.