पुणे: राज्यात पुर्वी सहा महिन्यांइतका चालणारा ऊस गाळप हंगाम आता केवळ तीन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपहयांची गुंतवणूक असलेली कारखानदारी एवढ्या कमी कालावधीसाठी चालण्याने साखर कारखान्यांना तोटा होत असल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आहे असे बोलून न थांबता त्या संकटावर मात करण्यासाठी पर्याय शोधण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टनास 4300 रुपयांइतकी उच्चांकी दर देणाऱ्या गुजरामधील गणदेवी साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन अन्य साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Latest Pune News)
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) ७० वे वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाचे हॉटेल जे.डब्ल्यू मेरिएट येथे सोमवारी सकाळी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन. चिनप्पन, द डेक्कन शुगर टेकनोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य सरकारच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे नमूद करुन भरणे म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर उद्योगात झाला पाहिजे.
नवीन ऊस वाण विकसित आणि त्या माध्यमातून अधिकाधिक ऊस उत्पादन तसेच साखरेचा उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जागतिक स्तरावरील नवनवे तंत्रज्ञान साखर उद्योगाला मिळण्यासाठी 1936 मध्ये डेक्कन शुगर संस्थेची स्थापना वालचंद हिराचंद यांनी केली. संस्थेचे संचालक मंडळ त्यादृष्टिने आजही काम करीत असल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी, संचालकांचे अभिनंदन केले.
एमएसपी तीच असताना वाढती एफआरपीचा ताळमेळ आवश्यक: सहकार मंत्री बाबसाहेब पाटील
केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री दर (एमएसपी) तोच ठेवला असताना दरवर्षी एफआरपीचा दर वाढत आहे. हा ताळमेळ घालावा लागेल, असे नमूद करुन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, देशात साखर उद्योगाच्या माध्यमातून मोठी आर्थिक क्रांती झाली.
कारखान्याच्या संचालक मंडळाने निर्णय घेतांना कारखान्याची आर्थिक परिस्थिती, उत्पादन, कामगाराचे वेतन, मुकादम, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार, उसदर आदी घटक विचारात घेऊन निर्णय घेतले पाहिजे. भावनिक निर्णय न घेता आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी सहकारी कारखान्यात होणारी अनावश्यक नोकरभरतीमुळे कारखाने अडचणीत येत आहेत. साखर उत्पादनासोबतच आता इथेनॉल, वीज, सीबीजीसारख्या उपपदार्थ निर्मिती हेच आता मुख्य उत्पादन झाले असून ती काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, साखर कारखान्याकरिता आर्थिक नियोजन महत्वपूर्ण असल्याने कारखान्यांनी व्यावसायिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. याबाबत असोसिएशनने तांत्रिक बाबीसोबतच आर्थिक नियोजनावरही आगामी काळात मार्गदर्शन केले पाहिजे. त्यासाठी राज्य बँकेकडून सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री भरणे आणि पाटील यांच्यासह मान्यवरांनी साखर प्रदर्शनाअंतर्गत भरलेल्या दालनाला भेट देऊन तंत्रज्ञान, उत्पादन आदी बाबी विषयी माहिती घेतली. यावेळी भरणे यांच्या हस्ते ७० व्या वार्षिक अधिवेशनानिमित्त कार्यवृत्त पुस्तिकेचे (प्रोसीडिंग्ज बुक) प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक एस. बी. भड तर आभार एस.डी. बोखारे यांन मानले.
डीएसटीएच्यावतीने देण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण
* साखर उद्योग गौरव पुरस्काराचे मानकरी: संगमेश निरानी-निरानी ग्रुप, बाबूराव बोत्रे पाटील-ओंकार शुगर्स, भावेश पटेल-बारडोली गुजरात, अरविंद गोरे-आंबेडकर शुगर, विनय कोरे-वारणा शुगर ग्रुप.
* बेस्ट शुगर फॅक्टरी 2025 पुरस्कार: राजारामबापू सहकारी साखर कारखाना, व्यंकटेशकृपा शुगर मिल्स, नॅचरल शुगर ॲण्डअलाईड इंडस्ट्रिज, द्वारकाधीर शुगर, गणदेवी शुगर, व्यंकटेश पॉवर प्रोजेक्ट लि. तसेच यावेळी तांत्रिक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार व साखर उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलच्या पुरस्कारांचे वितरणही भरणे व बाबासाहेब पाटील आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.