पुणे: केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या दरवाढीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच साखर साठ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल अंतिम झाल्यानंतर कारवाईसाठी पावले उचलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्येही घबराटीचे वातावरण असून, कारवाईच्या शक्यतेने ग्राहकांची वर्दळही बाजारात कमी असल्याचे चित्र शनिवारी होते. तर एस-३० ग्रेड साखरेचा प्रतिक्विंटलचा दर आणखी ३०० रुपयांनी कमी होऊन ६,४०० ते ६,५०० रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले.
साखरेचे दर क्विंटलला सात हजार रुपये या विक्रमी पातळीवर पोहचल्याने साठातपासणीची मागणी सातत्याने सुरू झालेली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांकडून देशभरातील साखर आयुक्तांची ऑनलाइनद्वारे शुक्रवारी (दि. २१) बैठक झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामध्ये देशात साखरेचा राज्यनिहाय किती साखरसाठा शिल्लक आहे, याची माहिती प्राधान्याने घेण्यात आली. त्या वेळी साठवणूकदार, सट्टेबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. त्यातून साखर निविंदामधील खरेदीदारांची माहिती घेतली जाणे.
अपेक्षित असून, साखरसाठ्यांच्या तपासणीतून अंतिम पडताळणी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेही बाजारात सध्या घबराटीचे वातावरण असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली.
दरम्यान, घटलेल्या मागणीमुळे सावधानतेने साखर खरेदी व्यवहारास प्राधान्य दिले जात आहे. गरजेइतकीच साखर खरेदीकडे ग्राहकांचाही कल आहे. त्यामुळे साखरेच्या निविदा सहा हजार रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात नेमकी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय राहते? त्यावर दरपातळी अवलंबून राहील, असेही सांगण्यात आले.