रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) परिसरातील एका ढाब्यासमोर शनिवारी पहाटे अपघात झाला. अपघातातील वाहने घटनेनंतर बारा तास रस्त्याच्या कडेला पडली होती. पोलिस व महामार्ग टोल व्यवस्थापनाने याची दखल न घेतल्याने अनेकांनी खेद व्यक्त केला. खडकी परिसरातील हॉटेल बबिदासमोर शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास टँकर अचानक ढाब्यातून रस्त्यावर आल्याने सोलापूरकडे जाणार्या बसने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणारा मालट्रक बसवर आदळला.
त्यामुळे बस टँकरवर आदळली. या विचित्र अपघातात अनेक जण किरकोळ जखमी झाले. यातील वाहने दुपारपर्यंत रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी व महामार्ग टोल प्रशासनाने वाहने बाजूला काढण्यात असमर्थता दाखविली. याबाबत संबंधित विभागाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. रावणगाव औट पोस्ट पोलिस चौकीचे कर्मचारी परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त घालतात. मात्र, मोठा अपघात होऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत परिसरात चर्चा होती.