शिरूर; पुढारी वृत्तसेवा: रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे सोनेसांगवी परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले असल्याचे मत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्याचा दौरा केला. त्या वेळी सोनेसांगवी येथे जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, वाघाळे ते सोनेसांगवी या पाच कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ व ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, स्वाती पाचुंदकर, सदाशिव पवार आदींसह नागरिक उपस्थित होते. या वेळी वळसे पाटील म्हणाले की, औद्योगीकरणाच्या माध्यमातून झालेला बदल व विकास दुर्लक्षित करता येणार नाही. हे सर्व औद्योगीकरणाच्या माध्यमातून मिळाले आहे.
एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक छोटे-मोठे उद्योग या ठिकाणी आले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते म्हणाले, राज्यात नवीन सरकार येऊन तीन महिने झाले, पण अजून पालकमंत्री नाहीत, पुरेसे मंत्री नाहीत. त्यामुळे विकासकामांना चालना मिळत नाही, असेही वळसे पाटील म्हणाले. सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रय कदम यांनी स्वागत; तर मल्हारी काळे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच रवी काळे यांनी आभार मानले.