पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे यंदाही ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ या अभियान अंतर्गत ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र’ या विषयावर आधारित राज्यस्तरीय दिंडीचे आयोजन केले आहे. हा उपक्रम ९ ते २५ जुलै दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवायोजना विभागाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. गणेश भामे यांनी दिली आहे.
मागील २२ वर्षांपासून पुणे विद्यापीठाच्या एनएसएसमार्फत आषाढी वारीत विविध सामाजिक उपक्रमांची अखंड परंपरा सुरू असून, यंदाही राज्यभरातील विविध विद्यापीठांतील स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या दिंडीत सहभागी होणार आहेत.
या राज्यस्तरीय दिंडीत 'सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र' या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, वारीत सहभागी शेतकरी महिलांच्या सहभागाचे सर्वेक्षण, पालखीतळ व वारीमार्ग स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कथाकथनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांद्वारे सामाजिक जाणीव, पर्यावरणसंवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना उपक्रमाची माहिती देऊन त्यांचे हमीपत्र घेणे तसेच आवश्यक कागदपत्रांवर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून दोन प्रतींसह स्वयंसेवकांना पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
स्वयंसेवकांनी आज पुणे विद्यापीठात हजर राहण्याचे निर्देश
या उपक्रमासाठी ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यामधून निवड झालेल्या स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांची यादी संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व स्वयंसेवकांनी आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दत्तो वामन पोतदार संकुल येथील रासेयो कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.