वालचंदनगर/जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : वालचंदनगर (ता. इंदापूर) कंपनीतील कामगारांचा विविध मागण्यांसाठी 22 नोव्हेंबरपासून संप सुरू आहे. सोमवारी (दि. 25) खासदार सुप्रिया सुळे यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी लवकरच कंपनीच्या मालकांशी
बैठक आयोजित करणार असल्याची माहिती दिली. वालचंदनगर कंपनीतील 630 कामगारांनी रखडलेला वेतनवाढीचा करार त्वरित करावा, कामगारांचे अपग्रेडेशन करावे, कंपनीतील व्यवस्थापन व कामगार संबंध सुधारणा व कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करावे, उत्पादन प्रक्रियेमध्येे कंत्राटी कामगारांचा होत असलेला बेकायदेशीर वापर थांबवावा, गणवेश देण्यात यावा, थकीत देणी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. सोमवारी संपाचा 33 वा दिवस होता. खा. सुळे यांनी संपावर तोडगा काढण्यासंदर्भात कामगारांशी चर्चा केली. या वेळी कामगारांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या.
सुळे यांनी सांगितले की, कामगारांच्या प्रश्नावर येत्या 15 दिवसांत योग्य तोडगा काढू. आपण एका कुटुंबातील सदस्य आहोत. कामगारांवर अन्याय होणार नाही. लवकरच कामगार युनियनचे प्रतिनिधी व मालक यांच्यामध्ये बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादी का ँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, डॉ. संजीव लोंढे, आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड, सचिव शहाजी दबडे उपस्थित होते.
हेही वाचा :