Sia Ketan Horoscope Matching: पुण्यातील चर्चेत असलेल्या सिया-केतन प्रकरणाने केवळ गुन्हेगारी तपासापुरतेच नव्हे, तर विवाहापूर्वी केल्या जाणाऱ्या पत्रिका जुळवण्याच्या प्रक्रियेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात दोघांचे 36 पैकी 27 गुण जुळले होते, अशी चर्चा सुरू असून, इतके गुण जुळूनही नात्याचा शेवट इतका दुर्दैवी कसा झाला, याविषयी अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, ज्योतिषतज्ज्ञांच्या मते फक्त गुण जुळणे म्हणजे वैवाहिक आयुष्य यशस्वी होईल, याची हमी नसते. विवाहासाठी संपूर्ण कुंडलीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असते.
वैदिक ज्योतिषानुसार 36 पैकी 27 किंवा त्यापेक्षा अधिक गुण जुळणे चांगले मानले जाते. मात्र, अनुभवी ज्योतिषाचार्यांच्या मते विवाहाचा निर्णय केवळ गुणावर आधारित नसतो.
कुंडलीतील सप्तम भाव, शुक्र, मंगळ, राहू, शनी यांसारख्या ग्रहांची स्थिती, त्यांचे परस्पर योग, तसेच महादशा आणि अंतरदशा यांचाही अभ्यास महत्त्वाचा असतो. काही ग्रहयोग वैवाहिक जीवनात गंभीर मतभेद किंवा संकटांचे संकेत देऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, सहावा, आठवा आणि बारावा भाव तसेच क्रूर ग्रहांचे स्थान, सप्तम भावावरील दृष्टी आणि ग्रहयोग यांचाही विवाहाच्या दृष्टीने विचार केला जातो. त्यामुळे केवळ गुणांची संख्या पाहून निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे ते सांगतात.
तसेच ऑनलाइन सॉफ्टवेअर किंवा मोबाईल अॅपवरून फक्त गुण जुळवण्याऐवजी अनुभवी ज्योतिषतज्ज्ञांकडून संपूर्ण कुंडलीचे विश्लेषण करून घेणे अधिक योग्य असल्याचा सल्लाही दिला जातो.
दरम्यान, सिया-केतन प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीला नुकतेच चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले होते.
ही माहिती वैदिक ज्योतिषातील पारंपरिक मान्यता आणि ज्योतिषतज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. याचा कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणातील तपास, पुरावे किंवा न्यायालयीन निष्कर्षाशी संबंध जोडू नये. सिया-केतन प्रकरणातील सत्य परिस्थितीचा निर्णय केवळ पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.