शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शहरात खंडणीसाठी अपहरण करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली. आविष्कार लांडे (वय 22), अक्षय परदेशी (वय 23), कैलास ननवरे (वय 23) , हर्षल काळे (वय 22), अमोल लुनिया (वय 27) आणि अमोल ऊर्फ दादा खिलारे (वय 25, सर्व रा. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांना मंगळवारपर्यंत (दि. 20) पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढीलनुसार, शिरूर शहरातील मुंबई बाजार येथे घरासमोरून शतपावली करत असताना अभिषेक गंगावणे या युवकाचे 11 इसमांनी खंडणीसाठी अपहरण करून त्याला दशक्रिया घाटात नेऊन तलवार, हॉकीस्टीक व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या सर्वांनी मारहाण करीत 10 लाख रुपयांची खंडणी त्याला मागितली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फिर्यादीला फोन करून तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.
त्याबाबत अभिषेक ईश्वर गंगावणे (वय 22, रा. मुंबई बाजार, शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिस ठाण्याचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.