खेड शिवापूर : सिंहगड किल्ल्यापासून उगम पावलेली शिवगंगा नदी सध्या कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे नदीशेजारील शेतकर्यांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.
सिंहगड किल्ल्यापासून सुरू होणारी शिवगंगा नदी हवेली तालुक्यातील कल्याण, रहाटवडे, कोंढणपूर, शिवापूर, खेड शिवापूर त्यानंतर भोर तालुक्यातील रांजे, खोपी, कुसगाव, शिवरे या गावांशेजारून वाहते. या गावातील शेतकर्यांना शेतीसाठी नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कडक उन्हाळ्यामुळे नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे शेतीवर परिणाम झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत आहे. कूपनलिका, विहिरीचे पाणी देखील आटत चालले आहे.
शिवगंगा नदीवर कोल्हापुरी बंधार्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आहे त्या बंधार्यांची वेळोवेळी डागडुजी करणे महत्त्वाचे असते. मात्र, असे काही होताना दिसत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे. याला पूर्णतः संबंधित प्रशासन जबाबदार आहे असे मत नवविकास युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी व्यक्त केले.