शरद पवार File photo
पुणे

Sharad Pawar : पवार कुटुंबांचं मनोमिलन? अजितदादांबाबत शरद पवार स्पष्टच बोलले

शरद पवार म्हणतात, ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही, मला माहिती नाही. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.

पुढारी वृत्तसेवा

बारामती : ठाकरे कुटुंब एकत्र येणार की नाही, मला माहिती नाही. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मी त्यांच्याशी बोललेलो नाही, त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येतील का यावर मी कसे भाष्य करू, असे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या वाढलेल्या बैठका हे मनोमीलनाचे संकेत आहेत का या प्रश्नावर त्यांनी जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागते, असे सांगितले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार कुटुंबिय सातत्याने एकत्र येत आहे. यातून मनोमीलनाचे संकेत आहेत का, यावर खा. पवार यांनी थेट भाष्य टाळले. जनतेच्या कामासाठी एकत्र यावे लागते. ऊस उत्पादन वाढ आणि ऊस पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर यावर गेली वर्षभर आम्ही काम करत आहोत. सरकारच्या प्रतिनिधींशी बोलण्यात काहीही चुकीची गोष्ट नाही, असे शरद पवार म्हणाले.

राज्यामध्ये पाण्याची स्थिती गंभीर होत असल्याच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मी घेतलेल्या माहितीनुसार ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. निश्चित काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अशी परिस्थिती यापूर्वीही दोन-तीनदा आली होती. पण शेतकरी आता पाण्याचा जपून वापर करतील. आणखी दोन महिने काढायचे आहेत. काळजीपूर्वक पावले टाकून यातून बाहेर पडावे लागेल.

एआय तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यक्रम

देशाच्या कृषीमंत्र्यांनी एआय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर व्हावा असे सांगितले आहे. बारामतीत आपण गेली दोन वर्षे याचा अभ्यास करत आहोत. एआय तंत्रज्ञान शेतीसह अन्य क्षेत्रालाही उपयोगी आहे. पण आपला रस शेतीसंबंधी आहे. ऊस हे अधिक पाणी घेणारे पीक असल्याची तक्रार सातत्याने होते. एआयचा वापर केल्यास ३० टक्के पाण्याची बचत होते. उसाचा कालावधी कमी होतो, खतांची बचत होते. साखरेचे प्रमाण वाढते आणि जमिनीचा पोत कायम राहतो. त्यामुळे ऊसासाठी ते अधिक फायदेशीर आहे.

आपण या तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यक्रम घेतले. एक हजार शेतकऱ्यांची निवड केली. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबद्दल औत्सुक्य आहे, आताच धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी व काही कारखान्याच्या अध्यक्षांनी या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. आणखी पाच पिकांसाठी एआयचा वापर केला जाईल असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, या गोष्टीचा आनंद आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला होईल, असे खा. शरद पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT