राजगुरुनगर: एकाच प्रकारचे उत्पादन घेतल्याने बाजारात मोठ्याप्रमाणावर शेतमालाचे आवक होते. यामुळे भाव पडतात व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेे. परंतु, केवळ मार्केटचा अंदाज घेऊन व इतरांपेक्षा काही तरी वेगळ करत खेड तालुक्यातील चिंबळी गावातील सीमा जाधव यांनी कर्टुलीच्या शेतात शोभेच्या सूर्यफुलांचे आंतरपीक घेतले. केवळ वीस गुंठ्यातील या आंतरपिकातून जाधव यांना तब्बल एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या काही वर्षांत अनेक शेतकरी एकच पीक लावत असल्याने व ते एकाचवेळी बाजारात येत असल्याने भाव पडतो. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. त्यामुळे मिश्र शेती अथवा मुख्य पिकांत आंतरपीक घेण्याची काळाची गरज झाली आहे. अनेक कृषी अभ्यासक याबाबत शेतकऱ्यांना हा सल्ला देतात. (Latest Pune News)
त्यानुसार खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या आदर्श शेतकरी सीमा जाधव यांनी 20 गुंठे कुर्टुलीच्या शेतात आंतरपीक म्हणून शोभेच्या सूर्यफुलांची लागवड केली. टिकाऊ, देखणे व मजबूत अशा या फुलाला शहरी बाजारात पितृपक्ष सोडला तर नेहमीच चांगला भाव मिळतो, असे सीमा जाधव यांनी सांगितले.
जाधव यांनी आपल्या शेतात पाच पॅकेट म्हणजे तब्बल 5 हजार बी लावले. एका झाडाला एकच फुल येते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात 5 फुलांच्या बंचला सरासरी 200 रुपये भाव मिळाला. पंधरा दिवसांत या फुलांच्या शेतातून जाधव यांना तब्बल एक लाखांचे उत्पन्न मिळाले.
शोभेच्या सूर्यफुलाचे वर्षभर उत्पादन घेऊ शकतो. साधारण लागवडीपासून 55 दिवसांत ही फुले तोडण्यासाठी उपलब्ध होतात. एका झाडाला एकच फुल येते. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, लग्नसराईत या फुलांना चांगली मागणी असते. भावदेखील चांगला मिळतो. पुणे, मुंबई सह मोठ्या शहरांत या फुलांसाठी मार्केट उपलब्ध आहे.- सीमा जाधव, शेतकरी