शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू; उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी 2 मेपर्यंत मुदत pudhari photo
पुणे

Teacher Recruitment: शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू; उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी 2 मेपर्यंत मुदत

25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसर्‍या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार असून, मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय आणि या दोन्ही प्रकारात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील शिक्षक भरतीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी हे इयत्ता गट, अध्यापनाचे विषय, समातंर आरक्षणासह आरक्षण, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीत प्राप्त केलेले गुण, उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन ऑनलाइन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे.

स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. उमेदवारांना मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम निवडता येतील. मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील.

दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम तयार करून ते अंतिम करणे बंधनकारक आहे. प्राधान्यक्रम अंतिम न केलेले उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी स्वत:च्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर पात्रतेनुसार प्राधान्यक्रम असल्याची खात्री करून घ्यावी.

सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम अंतिम केल्यास निवडीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. प्राधान्यक्रम अंतिम केल्यावर त्यांना त्यात बदल करायचा असल्यास दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम रद्द करून पुन्हा प्राधान्यक्रम तयार करून अंतिम करता येतील. या सुविधेचा वापर जास्तीत जास्त तीन वेळा करता येणार आहे. प्राधान्यक्रम अंतिम करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, असे नमूद केले आहे.

उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यात तफावत आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल.

तसेच, खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याचे आढळल्यास, कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास, प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून शिक्षेस पात्र राहील, असा इशाराही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT